देऊळ , मंदिर , देवालय कित्येक समानार्थी शब्दांनी नावाजलेलं आणि नाना धर्मांनुरुप बदलत्या स्वरुपाचं बांधकाम पण त्याचं अस्तित्व परमेश्वराचं निवासस्थान असंच आणि शिकवण ही बहुधा तिच. ती पोहोचविण्याची आणि आत्मसात करायची पद्धत केवळ विविध तऱ्हेची. या अनुषंगाने एक फार सुंदर पंक्ती वाचनात आल्या होत्या..त्या अशा…'मत रोक शराब पिनेसे मुझे मस्जिद में…या वह जगह दिखा दे जहाँ खुदा ना हो' किती सच्चेपणाचं विधान आहे, नाही का? ज्या परमेश्वराने विश्वनिर्मिती केली तो काही एका मंदिराच्या चौकटीपुरता मर्यादीत नाही. आता परमेश्वर आहे अथवा नाही, आस्तिक – नास्तिक हा वादाचा आणखी एक विषय. तुर्तास त्या विषयावर भाष्य नको.
आपल्या खाद्यरुचीकडे लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येते की आरोग्याच्या दृष्टीने हिताचे पदार्थ सहसा सपक असतात आणि औषधी पदार्थांचा तर,कडवटपणा हा अपरिहार्य गुण म्हणता येईल. याउलट, जीभेचे अतिशय आवडते, चमचमीत पदार्थ खाल्ल्याने शरिराला फायदा तर नाहीच पण झाल्यास अपाय होण्याची शक्यताच अधिक असते. ही बाब इथे मुद्दाम नमूद करायचं कारण असं की, परिणाम-दुष्परिणाम माहित असताना देखील वाम परंतु तितक्याच आकर्षक गोष्टी करायला आपली लालसा जागृत व्हायचा वेग जितका जलद तितकाच जास्त वेळ एखादं सत्कृत्य आपल्या हातून घडताना लागत असावा. एखादी गोष्ट चूक की बरोबर हे जरी व्यक्तिनिहाय बदलत असलं तरी एखादं विघातक कृत्य आपल्या हातून घडलं तर त्याचं आपल्याला शासन मिळेल हा धाक निर्माण करणारी शक्ती म्हणजेच देव.अनघा म्हणे, ‘अदृश्य तेचि आभास..दृश्य तया वंदितो ठेवुनी आस'. मूर्तिपूजा करताना अंतरात्म्यातील ईश्वरी शक्तीचा नाद ऐकू येईलच या विश्वासाने कदाचित मूर्तिपूजा सुरू झाली असावी. माणसाच्या ह्रदयमंदिरात देव राहत असला तरी आसुरी शक्तींचा पगडा कधीही जडच ठरतो. आणि सुरूवातीला उल्लेखलेल्या पंक्तींच्या विरुद्ध दृष्टीकोन सध्या पाहण्यात येतोय. तो म्हणजे मंदिराबाहेर काहीही वागा, काही बिघडत नाही मग मंदिरातील दगडाला तरी का भ्यायचं?
‘जस्टिस फॉर असिफा' म्हणून कितीही निषेध केला तरी सरकार दरबारी आपल्या WhatsApp च्या DP, Status किंवा Facebook च्या Wall Post ना काडीची किंमत नसते. मुळातच कोणत्या बातमीला किती वाजवायचं त्याचं वेगळच राजकारण असतं. दिल्लीत झालेलं निर्भया प्रकरण, तिच्या यातना, तिच्या देहापेक्षाही तिचा आत्मा छिन्न विछिन्न होऊन तडफड तडफड करुन आपल्यातून गेला. ती रात्री उशिरा का प्रवास करत होती आणि दिल्ली कसं सुरक्षित नाही यापेक्षा तिच्या अपराध्यांना वेळेत शिक्षा होणं महत्त्वाचं होतं. हो, कारण गुन्ह्याचं शासन वेळेत झालं तरच तो न्याय अन्यथा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला ते एक निमित्त बनतं. त्या निर्भया नंतरही कित्येक निर्भया बळी गेल्या, आजही जातच आहेत. एक दिवसाला सरासरी कित्येक मुलींचं लैंगिक शोषण, बलात्कार हे प्रकार सर्रास होत असतात. मग नुसतं नाममात्र निर्भया म्हणण्यात अर्थ तरी काय? निर्भय खरे बलात्कारी, अत्याचारी तेच नराधम… लहानपणी झाडांची फुलं खुडताना एखादी कळी खुडली गेली तरी आई रागवायची कारण त्या कळीची कळी खुलायच्या आत तिचं आयुष्य संपवणं पाप असतं ही आईची शिकवण होती. पण असिफा नावाची ती चिमुरडी,काय चुक त्या निष्पाप जीवाची की तिने इतक्या जीवघेण्या यातना भोगाव्यात. तिच्यावर गुदरला तो प्रसंग त्याला बलात्कार म्हणतात हेही न कळायचं वय तिचं. शिशु वय अन शि आणि शु इतकाच त्या नाजुक अवयवांचा वापर माहित असायचं वय असताना त्या कळ्यांना कसं आणि काय लैंगिक शिक्षण देणार आहोत आपण? मग काय, कुस्करलं जाऊ द्यायचं का त्या कळ्यांना? होऊ द्यायची त्यांची पायमल्ली? आणि त्या अन्यायाला तरी निदान जात धर्म, लिंग, वर्ण यांचा भेदाभेद नसावा. मुलींवरचा बलात्कार जितका अक्षम्य तितकाच त्या चिमुरड्या पोरांना अपहरण करून त्यांना खाण्यापिण्यास मोताद करणं, त्यांच्या अवयवांची तस्करी , त्यांना मारहाण करणं हा प्रकार निष्ठुर, निंदनीय आहे. हा सारा छळवाद पाहून खरंच देवाच्या असण्याबद्दल मन कधी कधी साशंक होतं.
देव म्हणजे अधिक आणि दानव म्हणजे वजा असं जरी समजलं तरी अधिक आहे तिथे वजाही असायचच. सगळेच चांगले, गोड गोड वागावेत अशी अपेक्षा नाहीच करता येणार. पण आपल्या मन्मंदिराच्या गाभाऱ्यातला देव ईतुका तरी जागृत ठेवावा जेणेकरून कोणाच्या आयुष्याचा आपल्यामुळे पालापोचाळा होऊ नये. देवळात जाताना देवाला जागं करायला घंटानाद करतात. तसा थोडासा घंटानाद होऊ द्यात की आपल्या मनात…देऊळ म्हणजे आपणच ज्यात परमात्मा वास करतो. मग, त्या देवळाची झाडलोट करुयात का नियमित?
--अनघा
अप्रतिम लेखन
ReplyDeleteसमाजातील विध्वंसक लोकांना कोणाचा धाक उरलेला नाही
ReplyDeleteह्या लेखात शेवॆटी लिहील्याप्रमाणे सर्वांना सुबुध्दी होऊ दे ...
Very beautifully written
ReplyDelete